अखेर प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने (BCCI) आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) साठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. नीतू डेविड यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने एका पत्रकार परिषदेत या ‘टीम इंडिया’ची घोषणा केली, ज्यात अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले.
अनुभवी हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) संघाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) उपकर्णधार म्हणून तिची साथ देईल.
सर्वात मोठा धक्का म्हणजे, स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माला (Shafali Verma) संघात स्थान मिळालेलं नाही. तिच्या अलीकडच्या काळातील खराब फॉर्मचा तिला फटका बसल्याचं बोललं जात आहे. हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का असला तरी, निवड समितीने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदा कप आपलाच? अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा संघात समावेश
या विश्वचषकात भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघ पहिल्यांदाच ५० षटकांच्या विश्वचषकात उतरणार आहे. स्मृती मानधनावर उपकर्णधारपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. संघात जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि हरलीन देओल यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
त्याचबरोबर, प्रतिका रावलसारख्या नव्या दमाच्या खेळाडूलाही संधी देण्यात आली आहे, जिने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं आहे.
यष्टिरक्षक म्हणून ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया या दोन पर्यायांना संधी मिळाली आहे. गोलंदाजीची धुरा रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव यांच्या खांद्यावर असेल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संपूर्ण स्क्वॉड (ICC Women's World Cup 2025 Indian Team Squad)
- हरमनप्रीत कौर (कर्णधार)
- स्मृती मानधना (उपकर्णधार)
- प्रतिका रावल
- हरलीन देओल
- दीप्ती शर्मा
- जेमिमा रॉड्रिग्स
- रेणुका सिंह
- अरुंधती रेड्डी
- ऋचा घोष (यष्टिरक्षक)
- क्रांती गौड़
- अमनजोत कौर
- राधा यादव
- स्री चरणी
- यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक)
- स्नेह राणा
#TeamIndia squad for ICC Women's Cricket World Cup 2025⬇️
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2025
Harmanpreet Kaur (Capt), Smriti Mandhana (VC), Pratika Rawal, Harleen Deol, Deepti Sharma, Jemimah Rodrigues, Renuka Singh Thakur, Arundhati Reddy, Richa Ghosh (WK), Kranti Gaud, Amanjot Kaur, Radha Yadav, Sree Charani,…
शेफाली बाहेर, पण का?
शेफाली वर्माला संघातून वगळण्याचा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. एकेकाळी भारतीय फलंदाजीचा कणा मानली जाणारी शेफाली गेल्या काही काळापासून आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेली नाही.
तिचा फॉर्म परत यावा यासाठी ती सध्या भारत 'अ' संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्याचा विचार निवड समितीने केल्याचं स्पष्ट दिसतंय.
भारत-पाकिस्तान महामुकाबला ५ ऑक्टोबरला!
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. भारत आपला पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध बंगळुरू येथे खेळणार आहे.
मात्र, तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे ते भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याकडे. हा हाय-व्होल्टेज सामना ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्येच होणार आहेत, तर भारतातील सामने बंगळुरू, इंदूर, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जातील.
टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक:
- ३० सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका (बंगळुरू)
- ५ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (कोलंबो)
- ९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (विशाखापट्टणम)
- १२ ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (विशाखापट्टणम)
- १९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड (इंदूर)
- २३ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (गुवाहाटी)
- २६ ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश (बंगळुरू)
आता हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक जिंकून करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या